मुंबईत ‘पेस्ट कंट्रोल’ची उत्तम सेवा दिल्याबद्दल आणि गरजू महिलांना रोजगार मिळवून दिल्याबद्दल ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा नुकताच नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला. ऑल इंडिया अचीव्हर्स फाउंडेशनने या कंपनीला ‘आउटस्टँडिंग अचीव्हमेंट अॅवॉर्ड’ देऊन गौरविले. ही कंपनी राकेश रमेश बैकर या मूळच्या कुडावळे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) या कोकणातील छोट्याशा गावातील तरुणाची आहे. कोणतीही योजना किंवा बँकेची मदत न घेता संघर्ष आणि स्वकष्टातून उभारलेल्या कंपनीच्या कामाची सात वर्षांत राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे, ही निश्चितच प्रेरणादायी कामगिरी आहे.
नवी दिल्लीतील ऑल इंडिया अचीव्हर्स फाउंडेशनतर्फे देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना गौरविण्यात येते. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एकूण साठ जणांना संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेला अत्यंत उत्तम पद्धतीने व्यवसाय केल्याबद्दल (आउटस्टँडिंग अचीव्हमेंट अॅवॉर्ड फॉर बिझनेस एक्सलन्स) आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. कंपनीचे संचालक राकेश बैकर यांनी तो पुरस्कार स्वीकारला. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, माजी मंत्री मणिशंकर अय्यर, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील संग्राम पटनायक आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळवणारी कंपनी ज्याने स्थापन केली, त्या राकेश बैकर या तरुणाची वाटचाल प्रेरणादायी आहे. ‘मराठी माणूस व्यवसायात मागे असतो,’ हे वाक्य खोडून काढणारी काही उदाहरणे अलीकडे दिसू लागली आहेत. त्यापैकीच राकेश हे एक उल्लेखनीय उदाहरण.
दापोलीपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेले कुडावळे हे राकेशचे मूळ गाव. घरची परिस्थिती गरिबीची. दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर राकेश दापोलीत आला आणि नवभारत छात्रालयात त्याची व्यवस्था झाली. गरजू मुलांची निवास व भोजनाची सोय किफायतशीर दरांत तेथे केली जाते. अर्थात, छात्रालयाची ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ‘कष्ट करून शिका’ या धोरणाची अंमलबजावणी तेथे केली जाते. संस्थेतील मुले संस्थेच्या आवारात भाजीपाला पिकवितात, भाजीपाल्याची, फळपिकांची रोपे-कलमे तयार करतात आणि त्यांची विक्री करतात. यातून संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळालेले आहे. त्यामुळे आधीपासूनच कष्टाची सवय असलेल्या राकेशच्या मनावर तेच संस्कार अधिक बिंबवले गेले. बारावीनंतर त्याने दापोलीच्याच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ‘बी. एस्सी. अॅग्रिकल्चर’ला प्रवेश घेतला. २००७ साली तो फर्स्ट क्लास मिळवून पदवीधर झालाही. त्यानंतर त्याने नोकरीसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला ‘डोमेस्टिक पेस्ट कंट्रोल’ अर्थात घरगुती कीड नियंत्रण क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळाली. लहानपणापासून शेतीशी असलेला संबंध आणि कृषी शिक्षणात कीटकशास्त्र हा विषय असल्यामुळे कीटक आणि त्यांचे नियंत्रण या विषयातील मूलभूत गोष्टींचे ज्ञान त्याला होते. आवश्यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तो त्या क्षेत्रात रुळला.
बचतीच्या पैशांतून रोवली मुहूर्तमेढ...
सुमारे चार वर्षे या क्षेत्रातील विविध कौशल्ये प्राप्त करून प्रगती केल्यानंतर त्या क्षेत्रातील नोकरीत आता आणखी आर्थिक किंवा एकंदरच वैयक्तिक प्रगतीला वाव नाही, असे राकेशच्या लक्षात आले. त्यानंतर छोटा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हवा, असा विचार त्याने केला. त्यातूनच त्याने नोकरी सोडली आणि विरारमध्ये १० बाय १०च्या छोट्या जागेत ‘पेस्ट कंट्रोल’चा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नोकरी करताना बचत केलेल्या पैशांतून या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्याने रोवली. कोणत्याही बँकेचे कर्ज मिळण्यासाठी तो थांबला नाही किंवा सरकारी योजनेचाही लाभ त्याने घेतला नाही. या क्षेत्रात चार वर्षे घेतलेल्या अनुभवाच्या आधारे आणि नोकरी करत असताना बचत केलेल्या पैशांतून केवळ २५-३० हजारांची गुंतवणूक करून त्याने नोव्हेंबर २०११मध्ये विरारमध्ये (जि. पालघर) ‘केअर इंडिया पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’ची सुरुवात केली.
हळूहळू परीघ विस्तारला
सुरुवातीला त्याने कामाला एक मुलगा ठेवला आणि तो स्वतः कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत होता. क्लायंट्सना भेटणे, त्यांच्या गरजा जाणून घेणे, त्या पूर्ण करणे यांसह सर्व प्रकारची कामे तो स्वतः करत होता. व्यवसाय सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचा विवाह झाला आणि त्यानंतर पत्नी रेवाचीही त्याला भक्कम साथ मिळाली. तीही या क्षेत्रात अगोदरपासून काम करत असल्यामुळे व्यवसायवाढीसाठी हातभार लागला. त्यातूनच पहिली एक-दोन वर्षे शिकण्याची, संघर्षाची गेली. हळूहळू कंपनीचा विस्तार होत गेला. कंपनीकडून उत्कृष्ट दर्जाची सेवा दिली जात असल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढत गेली. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागली. मुंबईतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे विरारमधून शक्य होत नसल्याने ठाणे, अंधेरी येथेही कंपनीची ऑफिसेस सुरू करण्यात आली. आज त्याच्याकडे एकूण ३० कर्मचारी कामाला आहेत. ठाणे, मुंबई, नवी मुंबई अशा विस्तीर्ण परिघातील क्षेत्रात राकेशची कंपनी सेवा देते. आज त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे एक कोटीवर जाऊन पोहोचली आहे.
कंपनीच्या सेवेची वैशिष्ट्ये
कंपनीच्या सेवेच्या वैशिष्ट्यांबद्दल विचारले असता राकेश म्हणाला, ‘ग्राहकांच्या गरजा ओळखून आम्ही काम करतो. अत्यंत वेळेवर सेवा देणे आणि ग्राहकाला हव्या असलेल्या वेळेत सेवा देणे, हेदेखील आमचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कंपनीला पेस्ट कंट्रोलचे काम दिवसाच्या वेळेत करून घ्यायचे नसते. त्यामुळे त्यांना रात्री किंवा अगदी मध्यरात्रीही काम करून हवे असेल, तर ते आम्ही करून देतो. माणसाला उपद्रव देणाऱ्या सर्व प्रकारच्या कीटकांचे, उंदीर-घुशी, वाळवी आदींचे नियंत्रण आमच्या कंपनीद्वारे प्रभावीपणे केले जाते. आमच्याकडील कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण देतोच. शिवाय ‘इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन’सारख्या संघटना किंवा ‘बायर’सारख्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणालाही त्यांना पाठविले जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान त्यांच्याकडे असते. त्याचा उपयोग ग्राहकांना दर्जेदार आणि प्रभावी सेवा देण्यासाठी होतो.’
कंपनीच्या कामाचा विस्तार वाढल्यानंतर आता विरारमध्ये कंपनीचे बॅक ऑफिस तयार करण्यात आले आहे. तेथील कामासाठी जाणीवपूर्वक जवळपासच्या ग्रामीण भागातील १४ महिलांची निवड करण्यात आली आहे. बुकिंग, तक्रार नोंदणी, तक्रार निवारण अशी फोनवरून किंवा इंटरनेटवरून होणारी कामे या ऑफिसमधील महिला करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अॅक्सिस बँक, अपना बँक, शॉपर्स स्टॉप, टाटा मोटर्स, रेमंड, झेनिथ हॉस्पिटल, बायोफार्मा, गोल्डन ट्युलिप अशा विविध क्षेत्रांतील कंपन्या या कंपनीच्या ग्राहक आहेत. त्यावरून ‘केअर इंडिया’च्या कामाच्या दर्जाची कल्पना येऊ शकते.
‘आई, पत्नी, भाऊ या कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा मिळाला, म्हणूनच ही वाटचाल सोपी होऊ शकली. शिवाय, मला कर्मचारीही अत्यंत चांगले मिळाले. कंपनीच्या सुरुवातीपासून काम करत असलेले सर्व कर्मचारी आजही माझ्याबरोबर काम करत आहेत. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज मिळालेले हे यश त्यांचेच आहे,’ असे राकेशने आवर्जून नमूद केले. ‘नफा-तोटा या वेगळ्या गोष्टी आहेत; पण स्वतःचे काही तरी चांगले उभे करू शकलो, याचे समाधान वाटते,’ असे तो सांगतो आणि जास्तीत जास्त चांगली सेवा देत काम करत राहणे, हेच आपले उद्दिष्ट असल्याचेही तो सांगतो.
कुडावळ्यासारख्या छोट्या गावातला राकेश आज मुंबईत सर्वार्थाने सेटल झाला आहे. मेहनत करून जिद्दीने मार्गक्रमण केल्यास आणि प्रामाणिकपणे, लोकांच्या गरजा ओळखून व्यवसाय केल्यास यश नक्की मिळते, हे राकेशच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. प्रेरणादायी झेप घेणाऱ्या राकेशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
कंपनीची वेबसाइट : http://careindiapestcontrol.in/